कालिदास चावडेकर : तीन गझला



 १.
दु:खांना मी कारण मागत नाही
अश्रूंचे रामायण ऐकत नाही

ऐकुन घे वा ऐकू नकोस माझे
मी कुठले पारायण घोकत नाही

स्वप्नी येतो जुनाट प्रेमळ वाडा
अता बाल्कनी अंगण वाटत नाही

कण्यात इतकी ताठरता आलेली
कुणापुढे लोटांगण घालत नाही

ब्रह्मांडाची तहान डोळ्यांमध्ये
स्वत:भोवती रिंगण आखत नाही

स्वभाव मनमोकळाच आहे पण मी
कोठेही निष्कारण बोलत नाही


२ .
माझ्याइतका नीच कदाचित
कोणी नाही, मीच कदाचित

आरोपी बिनदिक्कत सुटतो
शिक्षा त्याला तीच कदाचित

चुकतो आहे क्षणाक्षणाला
शिकण्याची संधीच कदाचित

काहीसुद्धा विकता येते
कमाल ही भलतीच कदाचित

जगतो अाहे अजून येथे
शंका आहे हीच कदाचित

मागेपुढे न कोणी माझ्या
स्पर्धा माझ्याशीच कदाचित

पोचत नाही अाभाळाला
उंची ही तितकीच कदाचित


३.
जाणिवांवर बांधले आहे धरण
पाझरत नाही अता अंत:करण

भाजण्या सरसावल्या पोळ्या किती
तापलेले पाहुनी वातावरण

घोळके सगळेच दिसती सारखे
मी करू त्यांचे कसे वर्गीकरण

फक्त नावे ठेवतो दुनियेस या
बदलुनी तू पाहिले का अाचरण

राहिली का देवळे निष्पाप ती
मी कुठे जाऊ अता सांगा शरण

एवढे लक्षात असुद्या मित्रहो
फार सोपे राहिले नाही मरण

- कालिदास चावडेकर
  

No comments: