डॉ स्नेहल कुळकर्णी : पाच गझला



१.
सलाम दुबळा करण्याआधी बंड करावे म्हणते
झुकण्याआधी अभिमानाने ताठ बसावे म्हणते

जाऊ कोठे चकव्यामध्ये.. धूसर झाल्या वाटा
चुकाण्याआधी आईचे मी बोट धरावे म्हणते

धगीत विरल्या चटक्यांची..मज भूक लागते आता
सूर्यासोबत रोज स्वस्तःला जाळून घ्यावे म्हणते

बंद जाहली..काळासंगे शिक्षकवृंदी शाळा
पाटीवरती पुन्हा एकदा ग..म..गिरवावे म्हणते

दिली कुठे तू..लाटेवरती कधी गुंजभर जागा
वाळूवरती.. रेघोट्यांचे घर बांधावे म्हणते

नाही जमले सरगम लिहिणे आयुष्यावर..कोऱ्या
तुझ्या देखण्या शब्दांवरती काव्य रचावे म्हणते

हा असला अन् तो तसला..का माप दुज्याचे भरतो
पूर्णत्वाच्या काट्यावरती तुज तोलावे म्हणते

जीवनमृत्यु ..अव्याहत हे..चक्र कधीचे फिरते
कोण सांगतो..वय आत्म्याचे.. मी ऐकावे म्हणते


२.
नको होऊस आयुष्या कुणावर भार  जाताना
जिवाचे पाखरू व्हावे...भवाच्या पार जाताना

सदा विळख्यात मोहाच्या..सुटावा पाश देहाचा
घडो चिरकाल आत्म्याशी..खरा शृंगार जाताना

मनाला वेढुनी कोणी...जिवाला खेचते मागे
पुन्हा वेड्या नको घेऊ अशी माघार जाताना

नको खटखट..अता ऐकू...नको खोलू गवाक्षेही
कडीकुलपात डांबावे...खणाचे दार जाताना

असे तू सूर छेडावे..जिणे हळुवार जगताना
जगाने मंद अळवावा...तुझा मल्हार जाताना

तुझी सत्ता...तुझी चर्चा..उद्या थांबेल हे सारे
गुणांचा मूर्त राहू दे...गळ्याशी हार जाताना

अघोरी घाव परतवले..जरी घायाळ पंखांनी
उरी अलवार झेलावा..यमाचा वार जाताना

३.
आणू कुठून आता शोधून..मी पुराणी
गेली निघून गेली माझ्यातली शहाणी

होते कधीतरी मी...समशेर दुर्बलांची
डोळ्यातुनी गळे का आता गुलाबपाणी

कळले मला न सारे...घडले अतर्क्य काही
जाणीव नेणिवांची पडली भ्रमात वाणी

हरवून टाकले मी..राजे गुलाम सारे
आत्ताच का खुशीने झुकते बदाम राणी

ठेक्यातल्या सुरांचे...आवाज बंद झाले
स्वर एक एक झुरुनी गातो मुकी विराणी

विरहात पोळलेली..मी मूर्त आसवांची
काळीज कापणारी..दावू कशी निशाणी

वणवा म्हणू तिला की..बरसात श्रावणाची
भलतीच तापदायी...प्रेमातली कहाणी


४.
किती मांडणी मी नव्याने करू
कहाणी पुराणी कितीदा स्मरू

विसाव्यास दे ना तुझा उंबरा
घरी वंचनेच्या किती वावरू

स्वतःला भिते मी कशी नेहमी
भिण्यालाच आता किती घाबरू

पुन्हा मूळ धरते तळाशी तृषा
कितीवेळ माथी उन्हाला धरू

तणावात येती किती आपदा
खुला श्वास घेण्या कितीदा मरू

कशी सांग लपवू  ..सुरंगी फुले
अकाली ऋतू लागले मोहरू

पुरा ऱ्हास होण्या नको थांबणे
जुन्याला नव्याने पुन्हा वापरू

५.
हृदयात आज माझ्या शिरण्यास वाव नाही
झाला चुकून तेव्हा आता लिलाव नाही

दाटून हुंदक्यांनो येऊ नका घशाशी
उरला मुळात माझा हळवा स्वभाव नाही

मुक्काम काय होता..पोहोचले कुठे मी
असता तुझ्यासवे का माझा पडाव नाही

लाचार दुःख माझे केलेस.. ठीक झाले
मोडीत मान आता...कुठला तणाव नाही

एकत्र बांधला मी..माझा तुझा किनारा
तरली समेवरी का..कुठलीच नाव नाही

सत्कार कैक माझे..झाले किती ठिकाणी
शब्दास तू दिलेला..कोठेच भाव नाही

कोंडून भावनांना कुढतोस का स्वतःशी
वेळीच गा स्वरांना...नंतर उठाव नाही


डॉ.स्नेहल कुलकर्णी
गारगोटी ,कोल्हापूर
9922599117

No comments: