भूषण अहीर : दोन गझला



१.
खूप दैवाने दिले ना बळ तुला..!!
भेटला आहे कधी कातळ तुला..?

सावलीतुन बोलली मज सावली
लागली आहे उन्हाची झळ तुला

वाढली तेव्हा दरी नात्यातली
आज पांघरतो जुनी वाकळ तुला

तू विसाव्याला जवळ घेशील का..?
आठवावा नेहमीचा पळ तुला

वाचली ज्ञानेश्वरी भूषण तरी
भेटला नाही मनाचा तळ तुला

२.

एकमेकांच्या उणीवा काढतो आपण
केवढे नैराश्य येथे पेरतो आपण

कैकदा ठरतो बळी विश्वासघाताचे
आतल्या आतच कितीदा वारतो आपण

भोगणे म्हणजे व्यथेवर मात करणे का..?
काय सुंदर वल्गना सांभाळतो आपण. . !

साचलेल्या शांततेेवर बुडबुडा येतो
त्याकडे का लक्षपुर्वक पाहतो आपण..?

तेच होते शेवटी जे व्हायचे असते
व्यर्थ चिंतेने स्वतःला जाळतो आपण

लाज वाटावी स्वतःची आरशालाही
एवढेही सत्य कोठे बोलतो आपण

काय मिळते वेगळ्या वस्त्रांमुळे भूषण
खेळ देहाचा उगाचच खेळतो आपण...

भूषण अहीर

No comments: