संगीता म्हसकर : तीन गझला



१.
पिंपळपानाच्या नक्षीची वही मिळावी म्हणते आहे..
आयुष्याची काही पाने पुन्हा लिहावी म्हणते आहे..

किती कहाण्या दडल्या होत्या मौनामागे सांग एकदा..
काठावरची काजळरेषा चिंब भिजावी म्हणते आहे..

नको दुरावा.. नको अबोला.. नको साद या एकांताची..
तुझ्या अंगणी.. पुन्हा चांदणी.. रात्र टिपावी ..म्हणते आहे..

अंधाराच्या ओळींमध्ये दिसतो आहे एक कवडसा..
जुन्या दिशांतुन नवी शलाका आज निघावी म्हणते आहे..

आठवणींचा पडदा अलगद डोळ्यापुढुनी सरकत आहे..
तुझ्या घराची वाट एकदा तरी दिसावी म्हणते आहे..

२.

अंधाराचा नेम‌‌‌ आजही चुकला होता..
तुझा कालचा चंद्र अंगणी उरला होता..

अर्ध्या भेटी.. अर्ध्या रात्री.. अर्धी वचने..
केसांमधला गजरा नकळत सुकला होता..

दूर दूर च्या क्षितिजाला ही कळले होते..
विश्वासाचा तारा जेव्हा तुटला होता..

बघता बघता गाभार्याला उजळुन गेला..
एक कवडसा मनामधे जो रूजला होता..

वळणावरती पाउल अडले तेव्हा कळले..
सहवासाचा ऋतु नेमका हुकला होता..

३.

कुठे राहिला चंद्र आरक्त आता ?
जुन्या आठवांच्या खुणा फक्त आता..

जराशा हवेने दिवा मंद झाला..
दिशांनो.. पहारा करा सक्त आता..

तुझे बोलणे की सुरीले तराणे ?
किती व्हायचे सांग आसक्त आता..

बरस आज येथे दयेच्या घना तू...
तुला पाहण्या थांबले भक्त आता..

तुझ्या पावलांचे ठसे अंगणी या..
पुन्हा वेचतो गंध प्राजक्त आता.

No comments: