हेमंत राजाराम : पाच गझला


१.
चढली नशा यशाची उतरायला हवी
चाहूल अपयशाची ही यायला हवी

ये भेट थेट बोलू सांगेनही तिला
स्वप्नात एकदा ती भेटायला हवी

वठला तरू तरीही ये पाखरू निळे
ही बातमी मुळांना कळवायला हवी

दाटून पार थकला अंधार केवढा...
काळोखवेळ आता उजळायला हवी

संवाद होत नाही नुसताच बोलतो
संपर्क साधने ही लपवायला हवी

आले दुरून काही हे सूर पाहुणे...
आता जुनी विराणी मज गायला हवी

२.
सहजपणाच्या ध्यासापाई अवघड होते आहे
कुठेतरी या जगण्यामध्ये गडबड होते आहे

दगडाचे काळीज घेउनी गाभा-यात उभा तू
सदैव माझ्या हृदयामध्ये धडधड होते आहे

भविष्यातल्या खिंडारांचे बांधकाम होताना
वर्तमान ओरडतो... सारी पडझड होते आहे

आभाळाची माय मरावी... त्याने खूप रडावे
स्वप्नामध्ये पत्र्यावरती तडतड होते आहे

स्पर्धा,चिंता,दुःख,वेदना,अभावदेखिल आहे
कोण म्हणाले? जगण्याची या परवड होते आहे


३.
मी धडपडतो, अडखळतो, पडतो आहे
पण त्याच त्याच वाटेवर फिरतो आहे

 बेभान कृतीच्या आधी कोठे होता ?
 हा नंतर कसला विचार छळतो आहे ?

आणतो आव जो समजुतदारपणाचा...
तो स्वतःपासुनी काय लपवतो आहे ?

पाहतो भोवती नसण्याच्याच खुणा पण
सर्वत्र तुझा आभास खुणवतो आहे

काळाने नेला तुकडा एक स्वतःचा
काळाचा दुसरा तुकडा रडतो आहे

तो मेघ कशाने काळवंडुनी गेला
आसवात कुठला श्रावण जळतो आहे


४.
जातीपाती मानत नसतो खेळ भुकेचा
नात्यालाही मानत नसतो खेळ भुकेचा
         
भरल्या पोटी वाढत जाते भूक मनाची
जगण्याचीही स्पर्धा करतो खेळ भुकेचा

धुरहि नाही राखहि नाही तरी होरपळ
बिन आगीचा जाळत असतो खेळ भुकेचा

तहान भागेना मातीची भूक हरवली
भूकबळीला कारण बनतो खेळ भुकेचा

खेळायाच्या दिसात लावी खेळ कराया
बाळवयाशी खेळत बसतो खेळ भुकेचा


५.
स्वप्नात कळीच्या दरवळ येऊ लागे
फुलण्याच्या गावी सुगंध नेऊ लागे

घुटमळता वारा पानांपानांतून
वेलीस सुखाची भोवळ येऊ लागे

लगडून फळांनी येता झाड हवेसे
वेल्हाळ पाखरू ओळख देऊ लागे

आनंद कशाचा मानू लागे वेडे...
गळताच पान जे गिरकी घेऊ लागे

हे वठून गेले झाड तरीही ताठ
मजबूत मुळांची साक्षच देऊ लागे

तोडून फूल नेताच सखीने माझ्या
देठास फुलाचा परिमळ येऊ लागे

- हेमंत राजाराम

No comments: