निर्मला सोनी : तीन गझला



१.  
तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही
अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही

गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे
जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही

आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे
आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही

मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला
म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही

आयुष्य युद्ध आहे जिंकून एकदा घे
सांगू नको पुन्हा की लढण्यास वेळ नाही

२. 
मी शहाण्या परी वागणे सोडले
या जगाच्या पुढे हारणे सोडले

हाक देऊ नका वादळाला कुणी
शांत लाटेवरी भाळणे सोडले

वाटले जे मला वाटले ना तुला
फक्त आशेवरी राहणे सोडले

कोण झाला सुखी सांग ना या जगी
मी जगाला सुखे मागणे सोडले

होत नाही कुणी जर कुणाचा इथे
रोज दुःखास या माळणे सोडले

वाटले ते खरे पाहिले जे अता
भूतकाळास त्या चाळणे सोडले

३. 
दिसेना तुला जे तुझ्या आत आहे
अशा कोणत्या तू विचारात आहे

नका पैज लावू कुणीही तिच्याशी
सखी एक माझी हजारात आहे

कुणा सांग सांगू कथा जिंकण्याची
निघाल्या दिशा या लिलावात आहे

सुखाच्याच मागे बघा दुःख येते
तरी जिंदगी ही दिमाखात आहे

सदा जात येते इथे आडवी का ?
अशी कीड सा-या समाजात आहे

- निर्मला सोनी

No comments: