रवींद्र ठाकुर : दोन गझला



१. 
आसवांचा पूर्ण केला मी चुकारा
कर व्यथे कोरा तुझा गे सातबारा!

दुःख, चिंता, वंचनेचा बारमाही
का असे माझ्याच हृदयाशी निवारा?

तोड़ तू ,तुटतील सारी बंधने ही
बस पुरे आता मनाचा कोंडमारा

अडकलो फेऱ्यात, सुटले गाव मागे
अन सुरू झाल्यात इथल्या येरझारा

या मनी लपले असावे मूल अवखळ
बघ किती करते विचारांचा पसारा

शांत बस बोलू नको सत्यासही तू
या जगी बदनाम आहे बोलणारा

जिंकण्याचा कैफ सांगे क्षम्य आहे
काप दुसरा,पाय दिसता जिंकणारा

२. 
 आहे असे बिलंदर अर्काट चोर आत्मे
बदलून देह नेती दुनिये समोर आत्मे

जगवंद्य दैवतांना जातीत वाटल्यावर
रडले किती बघा ते स्वर्गात थोर आत्मे

बघ पांढऱ्या ढगांनी करता नभात गर्दी
नाचावयास जमले ते थोर मोर आत्मे

कोटयावधी गुन्ह्यांचे कोट्यावधी पुरावे
झाले न सिद्ध अजुनी म्हणती मुजोर आत्मे

वातावरण इथे हे झाले किती विषारी
साऱ्या गुन्ह्यात सामिल दिसती किशोर आत्मे

- रवींद्र ठाकुर



                   

No comments: