विशाल ब्रह्मानंद राजगुरु : चार गझला


१.
शब्दांइतकी तलवारीला धार कुठे?
चिरेल काळिज तिचा एवढा वार कुठे?

नको काळजी करूस तू ह्या वाऱ्याची
तुला सोडुनी जाउन तो जाणार कुठे?

दिवे लावले उजेड झाला रस्त्यावर
मिटला त्याने घरातला अंधार कुठे?

नदी राहिली तहान शमवत लोकांची
तिला कळाला धरणाचा व्यवहार कुठे?

घरा एवढे कुणी आपले असते का?
त्याच्या इतका मिळतो का आधार कुठे?

अशा प्रकारे त्याची ओळख झालेली
झाला नाही वेडा ना लाचार कुठे?


२.
गर्दीमधली तळमळ होतो आपण दोघे
घामाचाही दरवळ होतो आपण दोघे

फुला कळ्यांचे कधी बोलणे ऐकलेस का?
की बागेचा दरवळ होतो आपण दोघे

वाऱ्यालाही सूर गवसतो जेव्हा त्याला
आठवते की सळसळ होतो आपण दोघे

जन्माभवती मृत्यू पिंगा घालत होता
इतकी त्याची तळमळ होतो आपण दोघे

झरा कधीही एकलकोंडा वाटत नव्हता
जेव्हा त्याची खळखळ होतो आपण दोघे

अपुल्याला जी बघून केव्हा शमली नाही
ती दुनियेची जळजळ होतो आपण दोघे

ज्या शब्दांनी वैऱ्यांचीही मने बदलली
त्या शब्दांची कळकळ होतो आपण दोघे


३.
मनात माझ्या एक शहर झगमगते आहे
असे कोणते दुःख साजरे करते आहे?

तिला पाहुनी तहान सुद्धा रंग बदलते
क्षणात व्याकुळ करते क्षणात शमते आहे

इतके कोणी मला आजवर छळले नाही
जितकी आता तिची आठवण छळते आहे

टिकून आहे अजून नाते अमुचे कारण
दोघांनाही अपुली जागा कळते आहे

सौख्य नांदते घरात कळते ह्यावरूनी की
अजून खिडकीमध्ये चिमणी बसते आहे

इथे येउनी ती गेली असणार कदाचित
बाग म्हणूनच अजूनही दरवळते आहे

स्पर्श तिला मी केल्यावरती मला कळाले
हवा एवढी माझ्यावर का जळते आहे?


४.  
पाहण्या आलो जगाला का तुझे ऐकून मी?
पाहिले जग आणि गेलो पार ओशाळून मी

वाकवावी लागते जर मान माझी सारखी
मग मिळवले काय उंची एवढी गाठून मी?

एवढी घाई कशाला? भोग तू आधी तुझे
मग तुला सांगेन माझे दुःख समजावून मी

बोलणारा भेटतो कोणी न कोणी हे मला
चल पुढे बिनधास्त तू, आलोच बघ मागून मी

एवढे नक्की, पुन्हा जर भेटलो आपण कधी
तू तरी जाशील वा जाईन भांबावून मी

ओळखू शकलो न मर्यादा सुगंधाची खरी
शेवटी निर्माल्य झालो 'मी'पणा फुलवून मी

तू जरी दिसलीस गाताना जगाला आजवर
पण खरी गातो गजल माझी तुझ्या आतून मी

- विशाल ब्रह्मानंद राजगुरु

No comments: