सुनिता रामचंद्र : पाच गझला



१.
आयुष्य पापण्यांचे पाण्यासवेच सरते
नसते कुणीच तेव्हा ... तेव्हा कुणीच नसते
तो भांडतो तिच्याशी वर्गात सारखा अन
बसतो तिथेच ती ज्या बाकावरून दिसते
जन्मास बाळ येते तो क्षण अपूर्व असतो
अवकाश व्यापुनी ती केंद्राकडे सरकते
भिंतीत वाढलेली धुसपुस तिला कळाली
पडवीत एकटीशी आई उगाच हसते
आता पुन्हा नव्याने मांडू कसे मला मी
डावीकडे सरकत्या  शुन्यास  मोल नसते ...
२.
द्वैतातुनी जगाचा विस्तार होत गेलो
केव्हा उजेड केव्हा अंधार होत गेलो
एकेक रेघ माझी होती इतस्ततः पण
तू सांधलेस त्यांना आकार होत गेलो
दोघे बरोबरीने वागू असे म्हणालो
कळले मला न केव्हा अधिकार होत गेलो
डोळ्यातल्या तुझ्या त्या कळसास पाहिल्यावर 
गाडून घेतले अन आधार होत गेलो 
गरजा कधीच शाश्वत नसतात बघ कुणाच्या
गरजा तुझ्या बदलता बेकार होत गेलो
तत्वांस  मारल्यावर उरलो  कुठे
तसा मी 
दुनिये तुझ्याप्रमाणे बाजार होत गेलो
३.
ओसाड होत गेले वाडे ,घरे नि गावे
उरलेत पिंपळाच्या पारावरी  पुरावे
कुरकुर बराच करतो सांधा बिजागिरीचा
दारास  खुपदा तू दुर्लक्षिले असावे
भुंग्यास लाभते  जी कमळावरी समाधी
माझे तुझ्यात असणे तितकेच खोल व्हावे
उद्देश पाखराचा नसतो उपद्रवाचा
बसतात ना तरीही तारेस हेलकावे...
मुद्दयास सोडूनी तो प्रस्तावनाच देतो
टाळायचे असावे बहुतेक बारकावे
देवून अंगठा तो आस्तित्वशून्य झाला
म्हणजेच श्रेष्ठ असणे जातीवरी नसावे
४.
कोणती केलीस जादू  पाखरा
अंबराचा ध्यास धरतो पिंजरा
जर दिशा निर्देशिली होती खरी
का तुझा मग हात झाला कापरा
संपला उपयोग माझा शेवटी
दे अता फेकून दे हा मोहरा
जीव जर जडला शिकाऱ्यावर कधी
आवडू लागेल त्याचा पिंजरा
अभिनयाची गरज नाही राहिली
केवढा निष्णात झाला चेहरा...
५.
बंद दाराआड चर्चा फार झाली
अन लगेचच मागणी गपगार झाली
सासरी होती किती कौतूक होते
तीच माघारी परतली... भार झाली
काल तर साधी नखे नव्हती तिला मग 
का कश्याने आज ती तलवार झाली
झेप म्हणजे काय असते सांग आई
तेवढयासाठीच मग ती घार झाली
प्रश्न चिघळत ठेवणे अनिवार्य असते
त्यामुळे तर घोषणा सरकार झाली ....
- सुनिता रामचंद्र

No comments: