कमलाकर आत्माराम देसले : पाच गझला



१.
बोलतांना किती बागडू लागलो
वाटते मी तुला आवडू लागलो

पापण्यांना असा पूर येतो कसा
कारणाविण कसा मी रडू लागलो

सत्य झाले जरी कोवळे कोवळे
मी मला तेवढा पाखडू लागलो

सप्तरंगी मला भास होतात अन
हाय स्वप्नात मी बडबडू लागलो

घुसमटावे किती शब्द ओठावरी
सांगतांना तुला अवघडू लागलो

सत्य जेव्हा मुखातून आले तसा
या जगालाच मी नावडू लागलो

घाव अंगावरी घाल तू प्राक्तना
मी अताशा जरासा घडू लागलो

मी जसाच्या तसा राहिलो त्यामुळे
लोक म्हणतात त्यांना नडू लागलो

एकटे राहणे साधले आणि मी
फार लौकर मला सापडू लागलो

२.
सहवासाहुन तुझ्या कोठला श्रावण नाही
जगण्याचे मारण्याचे उरले कारण नाही

हृदयाच्या भिंतीतुन ऐसे पाझरते की
प्रेमाच्या या पाझरण्याला लिंपण नाही

जसा आहे मी तसा मला दाखवतो केवळ
मना सारखा दुसरा कुठला दर्पण नाही

करून घे तू पाप कितीही उंचीवरचे
भरला नाही असा कोठला रांजण नाही

समता जेव्हा रक्तामध्ये रुजून येते
तिथेच सरते जात जिथे आरक्षण नाही

शब्दाविन सांगणे ऐकणेसुद्धा घडते
मौनाहुन कुठले सुंदर संभाषण नाही

चढल्या नंतर उतार येतो म्हणून चढतो
मला कोठल्या उंचीचे आकर्षण नाही

३.
मी शब्दांनी बोलत नाही
तू मौनाला ऐकत नाही

परमाणूहुन लहान होतो
नभात मग मी मावत नाही

मागुन घेइल कुणी म्हणुनी
दुःख भरजरी सांगत नाही

पाहून होईल दुःख दुजाला
म्हणून तर मी हासत नाही

बदलणार जे नाही कधीही
त्या सत्याशी भांडत नाही

मी अश्रूंची शेती करतो
नभास पाणी मागत नाही

तुला सोडुनी कुणाकडेही
चुकून सुद्धा पाहत नाही

तुझ्या मिठीची ऊब मिळावी
म्हणून स्वेटर घालत नाही

४.
मी दिव्याची पारदर्शी काच होतो
काळजीच्या काजळीचा जाच होतो
 
जीवनाशी साधता आलीच लय तर
चालणाऱ्या पावलांचा नाच होतो
 
निष्कपटता तेज असते सज्जनाचे
त्यामुळे तर शब्द त्याचा साच होतो

शंभरांना मारण्यासाठी मुरारी
पांडवांच्याही रूपाने पाच होतो
 
नागरिक झालो जगाचा फेसबुकने
काल जो मी फक्त गावाचाच होतो

आपल्यांनी शिकवले मज राजकारण
मी मुळापासून पण साधाच होतो
 
सभ्य जेव्हा लाच घेतो पाहिले की
सज्जनाला जीवघेणा जाच होतो

जिंकता येते अधर्माने लढाई
मात्र जय युद्धात सत्त्याचाच होतो
 
५.
पाहिला संवेदनेचा आरसा
आणि सिंहाचा पहा झालो ससा
 
खोदल्याने संपतो अंधार का ?
पेटवावी ज्योत होतो खालसा
 
मस्तकाला घडविणाऱ्या फक्त या
पुस्तकांचा लाभला मज वारसा
 
जाळते , उजळून देते आग अन-
हात काळा करत असतो कोळसा
 
श्वासही सोडून जातो शेवटी
का कुणी द्यावा कुणाचा भरवसा

मी व्यथेचा जर विदूषक वाटतो
आसवे येतील इतके मग हसा
 
काळजाची वेल जाता सासरी
बाप रडतो मूल होउन ढसढसा
 
लेक पोटातून जाते मारली
त्याहुनी कुठला असावा हादसा

हे ऋतूंचे बेईमानी वागणे
मी मनावर घेत नाही फारसा
...............................
-कमलाकर आत्माराम देसले

No comments: