जयेश पवार : पाच गझला






१.
किती आज ओसाड झाल्यात बागा ?
फुलांना फुलांचाच असणार त्रागा !

जिथे प्राण जाईल हळुवार माझा
असावी अशी एक नाजूक जागा !

कधीही कुठेही बरसतो अचानक
किती सावरू एक अश्रू अभागा ?

तिच्या दोन ओठात ओलावला की
किती छान जातो सुईतून धागा ! 

हरवला कुठे पारिजातक कळेना
तुझ्या मोगऱ्यांनी सजवल्यात बागा ! 

तुझ्या शर्यतीनेच विध्वंस केला
हरवलेत घोडे , रिकामीच पागा ! 

बजावून आलोय दुःखास हे की..
अताशा जरासे हिशोबात वागा ! 

किती वेदनांशी गळाभेट झाली ?
सुखांनो तुम्हीही मिठी एक मागा ! 

अजुनही तुझी चाल ओठात आहे
किती छान गातोस गागा लगागा ! 

२.
काय असते जात दाखवतो
तो मला औकात दाखवतो 

मी तुझ्या बापास भित नाही
हात दे हातात.. दाखवतो 

प्रेम आहे बघ असा रस्ता
जो पुढे अपघात दाखवतो 

का घरातुन झाडता गोळ्या
या कधी चौकात ..दाखवतो

दाखवू का शान दगडांची
बघ अजिंठा.. त्यात दाखवतो 

कातळाचे घाव दाखवतो
बुद्ध मग त्याच्यात दाखवतो 

३.
निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना
नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना
कधीचे लावले आहेत मी वाटेवरी डोळे ,
जरा धावून येना तू, नको संताप डोळ्यांना 

सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर ,
नको देऊस कुठला यापुढे आलाप डोळ्यांना 

कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती ,
कधी आभाळ खाली आणुनी तू माप डोळ्यांना 

सुखाचे स्वप्न बघण्या रात्रभर ते धावले होते ,
म्हणूनी लागली होती सकाळी धाप डोळ्यांना 

तुझी टिकली ,तुझे झुमके ,किती सुंदर तुझे पैंजण ,
किती मी काय न्याहाळू, किती हा व्याप डोळ्यांना 

रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे ..
असे इच्छा मुलीची की ,दिसावा बाप डोळ्यांना 

४.
अश्रू अनंत होते भाग्यात पापणीच्या
आजन्म वाहिली ती शोधात ओंजळीच्या 

हरवून मी स्वतःला मग जिंकलोय बाजी ,
पडलो कधीच नाही फ़ंद्यात शर्यतीच्या 

दिसते समोर जेव्हा दुसऱ्याच टेबलावर ,
हातात ग्लास फुटतो, रागात बाटलीच्या 

लिहिण्या नवीन काही सुचले खयाल नाही ,
मी योग्य लावल्या मग जोड्या अलामतीच्या 

का लाजली अचानक झोपेत बाहुली ही ?
आलाय बाहुला का स्वप्नात बाहुलीच्या 

झालो कधीच नसतो मी शोभिवंत इतका ,
नक्षत्र होत गेलो कक्षेत रोहिणीच्या 

या भाळल्यात वेली ज्याच्यावरी कधीच्या ,
तो पारिजात आहे प्रेमात बाभळीच्या 

५.
दूर जाऊ नको गैरसमजामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला
वाद मिटणार नाही दुराव्यामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला  

वेळ लावू नको राग काढू नको मी पुन्हा वाट बघतो उशाला तुझी ,
झोप येणार नाही मला यामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला 

याद येते तुझी सांजवेळी मला दुःख होते तसे भार ही वाढतो ,
दुःख होणार हलके बिलगल्यामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला 

काय झाले मला चालता चालता.. की तुला शोधताना भटकलोय मी ?
मी दिशाहीन होइल भटकल्यामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला 

एवढे ही नको रागवू आज तू..की पुढे त्रास होईल याचा तुला,
बर्फ ही संपतो बघ वितळल्यामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला 

जे तुला वाटले तेच केलेस तू घाव केलेस जे छान केलेस तू.
घाव भरणार नाहीत मलमामुळे ऐक माझे जरा भेट लवकर मला

- जयेश पवार

No comments: