सानिका दशसहस्त्र : चार गझला


१.
पसरली कारणे कासवगतीने केवढी घरभर
सशाचा वेग वाढवतो तुझ्यामाझ्यातले अंतर

जरा होतास अवघड तू तसा  समजावयाला पण
तुझी व्याख्या मला कळली तुला मी वाचल्यानंतर

तुझे असणे तुझे नसणे किती मानू खरे आता
तुझे अस्तित्व आयुष्या किती अस्थिर, किती धूसर

तिची घुसमट तिच्यापाशी तिचे अस्तित्व एकाकी
कुणालाही न दिसली ती...तिचा होता असा वावर

किनारा लाभला नव्हता कधीही आजवर कुठला
प्रवाही राहणे जमलेच ओघाने तिला नंतर

२.

एकमेकांचीच थुंकी चाटणारे लोक हे
एकमेकांनाच खाली ओढणारे लोक हे

फारसे कोणी कुणाचे होत नसते या जगी
स्वार्थ केवळ साधण्यातच दंगणारे लोक हे

फार अवलंबून असणे सोड तू आतातरी
साथ अर्ध्यातून कायम सोडणारे लोक हे

पालखी घेउन तुझी जे काल होते नाचले
तेच तर आहेत बघ लाथाडणारे लोक हे

गळ जरी आहे दिला हातामधे त्यांनी तुझ्या
ओळखावे तू ... गळाला लावणारे लोक हे

अंतरंगीच्या धगीला कोण हल्ली पाहते
चेहरे पाहून येथे भाळणारे लोक हे

३.

स्वाभिमानाला विकावे माणसाने?
एवढे हतबल नसावे माणसाने

बंधने येतात कर्तव्यांबरोबर
मोकळे होणे शिकावे माणसाने

प्राक्तने ठरतात येथे जन्मतांना
एवढे समजून घ्यावे माणसाने

वेदना तर जात नसते घोकल्याने
काळ जातो...शांत व्हावे माणसाने

जायचे नसते कधीही रिक्त हस्ते
काळजे जिंकून जावे माणसाने

४.

बरेच काही घडल्यानंतर
चूक उमजते चुकल्यानंतर

हात जरासे काळे झाले
उंचीवरती चढल्यानंतर

शून्यालाही मिळते किंमत
बाजू उजवी ठरल्यानंतर

परत कधी ती येतच नाही
वेळ एकदा सरल्यानंतर

कधीतरी तू भेटत जा ना
सूर्य जरासा कलल्यानंतर

उगीच चिंता करते आई
दिवा जरा फडफडल्यानंतर

घडते का हो...मनासारखे?
आपण थोडे झुकल्यानंतर
हात कितीदा रडला होता
लेकावरती उठल्यानंतर
- सानिका दशसहस्त्र

No comments: